Jayant Patil NCP: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मंगळवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात आली. तब्बल सात वर्षे राष्ट्रवादीच्या (NCP) प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयंत पाटील यांनी ही सूत्रं शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली. यावेळी समारोपाच्या भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) हे काहीसे भावनिक झाले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात आपण पक्षासाठी किती निष्ठेने आणि एकरुप होऊ काम केले, हे सांगितले. त्यांनी म्हटले की, ‘त्यादिवशी मी माझ्या बायकोला सांगितलं की, सात वर्षे झाली, पण एकदा पण सुट्टी काढली नाही आपण. मी म्हटलं शेवटी उद्देश हा …’, या वाक्यानंतर जयंत पाटील हे प्रचंड भावूक झाले. त्यांना रडू आले पण त्यांनी आपल्या भावनांना आवर घालत आवंढा गिळला. त्यानंतर काही काळ जयंत पाटील हे काहीच बोलू शकले नाहीत. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणबाजी सुरु केली. तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी हात उंचावून जयंत पाटील यांच्या समर्थकांना शांत राहण्याची सूचना केली. यानंतर जयंत पाटील यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्यांनी म्हटले की, ‘दोन दोन खासदार असलेला भाजप जर इतका मोठा होऊ शकतो तर 10 आमदार आणि खासदार असलेला आपला पक्ष का मोठा होऊ शकत नाही? हे सतत सर्वांनी कायम मनात ठेवा’, असा सल्ला जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
माझी कोणतीही संघटना नाही, वेगळा गट नाही, असलं पाप कधी केलं नाही. २ हजार ६३३ दिवस मी प्रदेशाध्यक्ष आहे. आता पदावरुन बाजूला व्हायची ही योग्य वेळ आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
Sharad Pawar: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली
अखेर शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवलीय. गेल्या अनेक वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर असलेल्या जयंत पाटलांची जागा आता शशिकांत शिंदेंनी घेतलीय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा एकप्रकारे विक्रमच केलाय…आता ते भाजपमध्ये जाणार की पवारांसोबतच राहणार, ही चर्चा सुरूच राहणार आहे. दुसरीकडे अतिशय कठीण काळात शशिकांत शिंदे यांच्यावर पदाची धुरा आलीय. आव्हानांवर मात करत शशिकांत शिंदे पक्षाला कशाप्रकारे नवी झळाळी देणार, हे आगामी काळात पाहावे लागेल.
