MSRTC Fare Hike Cancelled | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) एकेरी आरक्षणासाठी लागू केलेली ३० टक्के भाडेवाढ अखेर रद्द करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी हा निर्णय जाहीर केला.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत भावनिक आणि पारंपरिक महत्त्व असलेला सण आहे. दरवर्षी मुंबई, पुणे व अन्य शहरांमधून लाखो चाकरमानी आपापल्या मूळगावी कोकणात परततात. यावर्षी MSRTC ने एकेरी प्रवासासाठी ३०% भाडेवाढ जाहीर केल्याने नागरिकांत नाराजी निर्माण झाली होती. सोशल मीडियावरून आणि माध्यमांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
या विरोधाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भाडेवाढ रद्द करण्याचे आदेश दिले. पंढरपूर दौऱ्यात त्यांनी अधिकृतरित्या ही घोषणा केली. “सामान्य प्रवाशांवर आर्थिक बोजा नको,” असे सांगून त्यांनी जनतेच्या भावना समजून घेतल्याचे स्पष्ट केले. (MSRTC Fare Hike Cancelled)
हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमानींसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. गणपतीच्या काळात एसटी ही लाखो नागरिकांची प्रमुख वाहतूक व्यवस्था असते. त्यामुळे भाडेवाढ रद्द झाल्याने प्रवास अधिक परवडणारा आणि सुलभ होणार आहे. या निर्णयाचे कोकणवासीयांकडून स्वागत करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचा आर्थिक भार हलका होणार आहे. एकेरी आरक्षणावरची वाढ रद्द झाल्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच दरात तिकीट मिळणार आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवासाठी एसटीच्या विशेष गाड्याही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळते.
