मुंबई – महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र सरकारचे राज्यात एक कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी आम्ही २५ लाख लखपती दिदी तयार केल्या. यावर्षी आम्हाला आणखी २५ लाख जोडायच्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.
“महिला सक्षमीकरण हे कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे आणि महिलांना अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवल्याने देशाची आर्थिक स्थिती मजबूत होते. महिलांच्या ५० टक्के सहभागाशिवाय राष्ट्राचा सर्वांगीण विकास अशक्य आहे. महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणाचे महत्त्व अनमोल आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुलींसाठी उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केले आहे. आता ‘केजी टू पीजी’ पर्यंत मुली मोफत शिक्षण घेऊ शकतात. त्यामुळे शिक्षणात मुली मोठी प्रगती करत आहेत, ज्याचे उत्तम उदाहरण विद्यापीठांतील ‘गोल्ड मेडल’ मिळवणाऱ्या मुलींच्या वाढलेल्या संख्येतून दिसून येते,” असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. “बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ उभारण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले की, “या मॉल्समुळे बचत गटांमधील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी एक मोठे बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारख्या अनेक योजनांचा उल्लेख करत त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला. ‘मुद्रा योजने’च्या एकूण लाभार्थ्यांपैकी ६० टक्के महिला आहेत, ज्यामुळे लाखो महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली आहे.”
