सोशल मीडियाच्या जगात आज ‘लाइक्स’, ‘फॉलोअर्स’ आणि ‘अटेंशन’ या तीनच गोष्टींची चलती आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रील्समुळे तरुणाई बदलत आहे, संबंध बदलत आहेत, ‘क्षणिक ओळखी’चं आकर्षण निर्माण होतंय, तर यातून फसवणूक होत असल्याचं अनेकदा समोर येतं. पण, सोशल मीडियाच्याच या गोंधळात खऱ्या प्रेमाची एक प्रेरणादायी कहाणी जगासमोर आली. ही कहाणी आहे सोलापूरच्या अंजली शिंदे आणि आकाश नारायणकर यांची. या दोघांच्या प्रेमाची आणि जगण्याच्या संघर्षाची कथा थेट साऊथच्या मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
रीलच्या जगातला रिअल संघर्ष
तर, आकाश आणि अंजली आहेत रीलस्टार. हे दोघेही सोशल मिडियावर विनोदी व्हिडिओ करत प्रसिद्ध झाले. अंजलीबाईचे इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओही व्हायरल झाले. पण, या सुखी संसारात भलं मोठं वादळ आलं. अंजलीला अचानक ब्रेनट्यूमर असल्याचं निदान झालं. अन् हसत-खेळत असणारी अंजली बेडला खिळून राहिली. तसे हे दोघे मध्यमवर्गीयच. दोघांनाही आई-वडिल नाहीत.
अंजलीची अचानक झालेली ही अवस्था पाहून आकाशच्या पायाखालची जमीन सरकली. पण, आकाशही तितकाच हट्टी. आपण सावित्रीने यमाकडून पतीचे प्राण परत आणले असे ऐकले आहे. पण, आकाशने खऱ्या आयुष्यात अंजलीचे प्राण यमाकडून आणले असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
