आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. आता त्याच कोकणातून (Konkan) एक मोठी बातमी समोर येत आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि ठाकरे गट (Shiv Sena UBT) एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या एकत्रीकरणासाठी “शहर विकास आघाडी” या नावाने नवीन आघाडी निर्माण करून दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कणकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर, आणि सतीश सावंत हे उपस्थित होते. या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
Eknath Shinde and Uddhav Thackeray: ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता
बैठकीत दोन्ही गटातील नेत्यांनी स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दाखवल्याचं सूत्रांकडून समजतं. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकत्र येण्याची शक्यता आहे. शहर विकास आघाडी करून दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता आहे. संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. येत्या दोन दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या आघाडीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Rajan Teli: अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील
याबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली म्हणाले की, कणकवली शहरातून एक प्रस्ताव आलेला आहे की, सगळ्यांनी मिळून या ठिकाणी लढावं आणि शहर विकास आघाडी करावी. मात्र, अजून त्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय झालेला नाही. वरिष्ठांपर्यंत तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. गावातील प्रमुख मंडळींचा अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला आहे. मात्र अजून त्यावर निर्णय झालेला नाही. अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्या धर्तीवर इतर प्रमुख लोकांनी समोरासमोर बसून चर्चा केली आणि असा प्रस्ताव दिल्यानंतर वरिष्ठांना तो पाठवण्यात आला आहे. वरिष्ठ काय निर्णय घेतील? ते पाहू, असे त्यांनी म्हटले.
Rajan Teli: हा केवळ एकट्या शिवसेनेचा प्रस्ताव नाही
उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितले की, कोणाशीही युती करू. मात्र शिंदेंशी युती होणार नाही. तरीदेखील कणकवलीत अशा पद्धतीची युती होऊ शकते का? याबाबत विचारले असता राजन तेली म्हणाले की, यात नुसता उभाठा गट नाही तर कणकवलीतील इतर समाजसेवा करणारे मंडळे देखील आहेत. ते देखील यात सहभागी आहे. हा केवळ एकट्या शिवसेनेचा प्रस्ताव नाही. शहरासाठी काम करणाऱ्या मंडळींचा प्रस्ताव आलेला आहे. शहराच्या विकासासाठी एकत्र येणे आणि शहरातील मंडळींनी जे मुद्दे मांडले आहे त्यावर विचार करणे काही गैर नाही. यात आम्ही भाजपला विरोध करतोय, असे नाही. शहराच्या विकासासाठी एकत्र येऊया. यानिमित्ताने गावात एक चांगलं वातावरण तयार होईल, अशी सगळ्यांची भूमिका आहे. त्यानुसार सर्वांनी भूमिका घेतली आहे. ते मंजूर करायचे की नाही करायचे हा वरिष्ठांचा निर्णय आहे. त्यांचा जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही काम करू, असे त्यांनी म्हटले.
