सोलापूर – बहुजन समाजामध्ये शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव व मागासलेल्या सर्व समाजात जागृती करण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. याच कार्यासाठी त्यांनी देशभर दौरे केले आणि वंचितांचं प्रबोधन केलं. डॉ. बाबासाहेब हे 31 डिसेंबर 1937 रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या जुना कराड नाका येथे आले होते. तेव्हा पंढरीच्या विठ्ठल दर्शनासाठी लाखो भाविक येतात. त्याप्रमाणे बाबासाहेबांना पाहण्यासाठी लाखो भीमसैनिक आल्याचे आर. पी. कांबळे सांगतात. याबाबतच त्यांनी लोकल18 च्या माध्यमातून माहिती दिली आहे. पंढरपूर येथील जुना कराड नाका येथील गाताळे प्लॉट, मागाडे वाड्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या होत्या, महिलांनी बाबासाहेबांची आरती केली आणि जमलेल्या लोकांना बाबासाहेबांनी मार्गदर्शन केले होते. तसेच लोकांना स्वच्छता व शिक्षणाचे महत्त्व सांगितले होते. आता त्याच ठिकाणी बाबासाहेबांची आठवण म्हणून लोकवर्गणीतून बौद्ध विहार बांधण्यात आले आहे.
पंढरपुरातील जुना कराड नाका येथे जेव्हा बाबासाहेब आले होते, तेव्हा ज्या जुन्या लोकांनी त्यांना पाहिलं होतं, त्या लोकांचा गावकऱ्यांनी जिवंत असेपर्यंत सन्मान केला. तसेच याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तसेच बुद्ध पौर्णिमा व महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. 31 डिसेंबर 1937 रोजी बाबासाहेबांनी जुना कराड नाका येथे भेट दिली होती तो भेटीचा दिन देखील मोठ्या उत्साहाने या बुद्ध विहारामध्ये साजरा केला जातो.
