सोलापूर- “महाराष्ट्रातील राजकारणातून आता तत्व आणि विचार पूर्णपणे संपले असून केवळ सत्ता आणि टेंडरसाठी अभद्र युती केल्या जात आहेत. राजकारणात आता खुनांपर्यंत मजल गेली असून महाराष्ट्राचे आता ‘बिहार’ व्हायला लागले आहे,” असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दोन्ही पवारांनी भाजपला ‘उल्लू’ बनवले!
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीतील फुटीवर खोचक टिप्पणी केली. “शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही वेगळे नसून ते एकत्रच आहेत. त्यांनी मिळून भाजपला ‘उल्लू’ बनवले आहे. केवळ स्वतःच्या चौकशा थांबवण्यासाठी त्यांनी हे सर्व केले असून, भाजपने आतापर्यंत त्यांच्या केसेस दाबून का ठेवल्या, याचे उत्तर द्यावे,” असे आव्हान आंबेडकरांनी दिले.
टेंडरसाठी राजकारण; महाराष्ट्रात ‘बिहार’ पॅटर्न?
राज्यातील बदलत्या राजकीय संस्कृतीवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, “आता पक्ष आणि विचार महत्त्वाचा राहिला नसून केवळ सत्ता आणि त्यातून मिळणारे टेंडर महत्त्वाचे झाले आहे. टेंडर मिळवण्यासाठी निवडून आले पाहिजे आणि त्यासाठी खूनही केले जात आहेत. हे चित्र महाराष्ट्राला बिहारच्या दिशेने नेणारे आहे. वंचितच्या अर्ध्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
सुशीलकुमार शिंदेंवरही निशाणा
सोलापुरातील ‘बिनविरोध’ निवडणुकीच्या परंपरेवर बोलताना आंबेडकरांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही लक्ष्य केले. “शिंदे यांनीही यापूर्वी स्वतःला बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, तेव्हा चळवळीतील उमेदवार मल्लपा शिंदे ठाम राहिल्याने त्यांचा प्रयत्न फसला होता,” अशी आठवण त्यांनी करून दिली.
प्रणिती शिंदेंच्या रक्ताची लवकरच चाचणी!
खासदार प्रणिती शिंदे यांनी “माझ्या रक्तात काँग्रेस आहे” असे वक्तव्य केले होते. त्यावर सुजात आंबेडकरांच्या आरोपांचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “कुणाच्या रक्तात किती भाजप आहे, हे लवकरच दिसेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.”
