देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे; परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्वेतपत्रिका काढावी असे आव्हान काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, घोडबंदर-भाईंदर बोगदा आणि उन्नत मार्ग प्रकल्पात ३ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे, सुप्रीम कोर्टाचा हातोडा पडल्याने नाइलाजाने या प्रकल्पाची निविदा रद्द करत असल्याचे सरकारला जाहीर करावे लागले समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग आहे. या महामार्गासाठी किती पैसे लागले, कोणत्या पुलाला किती खर्च आला, एका किलोमीटरला किती खर्च आला, शेतकऱ्यांना भूसंपादनाचे किती पैसे दिले, कंत्राटदारांना किती दिले, झाडे लावण्यास किती खर्च आला आणि टोलमधून किती वसुली सुरू आहे याचा संपूर्ण लेखाजोखा श्वेतपत्रिकेतून मांडावा असे सपकाळ म्हणाले.
बगलबच्च्यांनी मोठा मलिदा खाल्ला
▶ घोडबंदर-भाईंदर प्रकल्पाप्रमाणे समृद्धी महामार्ग प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी यातून मोठा मलिदा खाल्ला आहे. समृद्धीच्या भ्रष्ट पैशातूनच ‘५० खोके एकदम ओके’चा कार्यक्रम झाला.
रस्त्याच्या अनेक भागाला तडे गेले
▶ समृद्धी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक भागात तडे गेले आहेत. महामार्ग सुरू झाल्यापासून विविध अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला तर शेकडो जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्ग हा फक्त सत्ताधारी पक्षातील मोजक्या लोकांची समृद्धी करणारा प्रकल्प ठरला आहे. यात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हेच धोरण : वडेट्टीवार
▶ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर जोरदार टीका केली असून, त्यांनी ‘सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता’ हे भाजपचे धोरण असल्याचा आरोप केला. नागपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवत, केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही त्यांनी शहर विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. वडेट्टीवार यांनी भाजपावर आरोप करत म्हटले की, भाजपने पैशाच्या जोरावर सत्ता मिळवण्याचे समीकरण प्रस्थापित केले आहे. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यशैलीवर आणि राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर परखड मत मांडले. भाजपने ‘सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता’ हे समीकरण चांगलं खेळलं आहे. नागपूर महापालिकेत अनेक समस्या प्रलंबित असताना भाजपने केवळ पैशाच्या बळावर सत्तेवर ताबा मिळवण्यावर भर दिला आहे.
