पंढरपूर – भीमा खोऱ्यातील घोड धरणातून पाच हजार क्युसेक विसर्ग सोडल्याने उजनीतून भीमा नदीतून कमी करण्यात आलेला विसर्ग १० हजार क्युसेक विसर्ग रविवारी दुपारी वाढवून १५ हजार करण्यात आला. दौंड येथून १० हजार ४३२ क्युसेक विसर्ग उजनी धरणात सुरू आहे.उजनी पाणलोट क्षेत्र असलेल्या भीमा खोऱ्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने गेल्या २४ तासांत उजनीची पाणीपातळी दोन टक्क्यांनी वाढवून सायंकाळी ६ वाजता ७२ टक्क्यांपर्यंत गेली होती. पंढरपूर आषाढी वारीसाठी उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवण्यात येत आहे. सध्या उजनीत एकूण १०२. २३ टीएमसी पाणीसाठा असून, ३८.५७टीएमसी उपयुक्त पाणी साठा आहे. उजनीतून भीमा नदीत १५ हजार क्युसेक, उजनी मुख्य कालवा एक हजार क्युसेक, वीज निर्मिती १ हजार ६०० क्युसेक, भीमा सीना जोड कालव्यातून ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
